शेकापचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांची निवडणुकीतून माघार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

रत्नागिरी : रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची अधिकृत माहिती समोर आली असली, तरी त्यांनी हा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
त्यामुळे उमेदवारी मागे घेण्यामागे नेमके कारण काय, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, त्यांच्या माघारीमुळे निवडणुकीतील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
04/06/2026



