रत्नागिरीत पक्षशिस्तीचा इशारा; “सव्वा वर्षानंतर पद सोडावेच”- पालकमंत्री ना.उदय सामंत

रत्नागिरी – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सत्तेतील पदांवरून श्रेयवाद आणि स्वतंत्र ताकद दाखवण्याच्या हालचालींवर आता पक्षाने स्पष्टपणे लगाम घातला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जाहीर केले की, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती-उपसभापती, गटनेते आणि प्रतोद यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल आणि कालावधी संपताच सर्वांनी पदत्याग करणे बंधनकारक राहील.
हा निर्णय “अंतिम” असल्याचे सांगत सामंत यांनी स्पष्ट केले की, सत्तेचे विकेंद्रीकरण आणि अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या धोरणानुसार हा फॉर्म्युला राबवला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच जिल्ह्यातील सर्व कामे आणि निधी वाटप होणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
निवडणुकीनंतर काही जणांनी निधी स्वतः आणल्याचा दावा करत स्वतंत्र प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर नोंद पक्षाने घेतली आहे. “पक्षाबाहेरचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा कडक संदेश देत सामंत यांनी कार्यकर्त्यांना पक्षरेषा पाळण्याचा इशारा दिला.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांवर पक्षाचे सभापती असतील, असा दावा करत निवडणुकीतील यश हे सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “यापुढे प्रत्येक काम पक्षाच्या माध्यमातून आणि नेतृत्वाच्या निर्देशानुसारच होईल,” असे स्पष्ट करत पक्षशिस्त भंग करणाऱ्यांना अप्रत्यक्ष इशाराच देण्यात आला.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



