आंधळा दळतोय आणि कुत्र पीठ खातोय यासारखा रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार- शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंखे
रत्नागिरी- शहरातील चर्मालय स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी संस्कार सुरू असताना विद्युत शवदाहिनीत बिघाड झाल्याच्या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने रत्नागिरी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवत नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या समोर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारण्यात आला. स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचा निष्काळजीपणा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यावेळी उबाठा शिवसेनेचे रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेटे, अमित विलणकर, विभागप्रमुख राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“मरणानंतरही रत्नागिरीकरांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत,” अशी खंत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशा प्रकारचा सुरू असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी यावेळी दिली.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
28/05/2026



