अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांचा पाहणी दौरा

सोलापूर- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या परिस्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी करताना, पंचनामे करून (सरसकट) तसेच मागील पुरस्थितीचा विचार करून संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना न्याय्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी विनंती केली.
ग्रामस्थांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत, गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी आज संगोबा गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान श्री. कदम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच उपस्थित अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची सविस्तर माहिती घेतली.

ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण वाढल्यास आगामी काळात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. तसेच लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश तात्काळ देण्यात आले.

यावेळी गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा वेगाने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळू शकेल. तसेच संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बचावकार्य, आरोग्यसेवा व तात्पुरत्या निवाऱ्याच्या सुविधा यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
कोकण ऑनलाईन



