भ्रष्टाचारी राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सोमवारी राज्यभर उग्र आंदोलन
रत्नागिरी – महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांनी महाराष्ट्र देशभरात बदनाम होत असल्यामुळे राज्यातील जनतेला या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्याला क्रीडामंत्री पदाची लॉटरी लागते, ‘सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचे काय जाते’ असे विधान करणाऱ्या समाजकल्याण मंत्र्याला साधी माफी मागायलाही सांगितले जात नाही. ‘हे सरकार भिकारी आहे’ असे म्हणणारे मंत्री मंत्रीमंडळात कायम राहतात. भ्रष्टाचार करणे आणि भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशातून आपल्या जवळच्या लोकांना श्रीमंत करणे एवढाच यांचा उद्योग आहे.
राज्यभरात आंदोलन करताना शिवसैनिक आणि पदाधिकारी राज्य सरकारमधील समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा ६० कोटींचा घोटाळा आणि १५०० कोटींचा गैरव्यवहार, कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचे रमीचे डाव आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वाह्यात विचारलेले प्रश्न, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेला डान्सबार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनीट्रॅप प्रकरण अशा अनेक विषयांचा जाहीर पंचनामा करणार आहेत.
राज्यस्तरावर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता हे उग्र आंदोलन करण्यात येईल. अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी दिली आहे.



