रत्नागिरीत ३० शाळांमध्ये होणार विद्यार्थ्यांची गलगंड तपासणी; ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान मोहीम
राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न

रत्नागिरी- राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गलगंड पुनर्सर्वेक्षण मोहीम राबविण्यासाठी रत्नागिरीत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. जिल्हा प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते करण्यात आले.
या मोहिमेंतर्गत ऑगस्ट ते डिसेंबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील ३० शाळांमधील इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांची गलगंड तपासणी करण्यात येणार आहे. प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत ही तपासणी केली जाणार आहे.
आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार, जिल्ह्यातील गलगंडाचे प्रमाण तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती संकलित करण्यासाठी हे पुनर्सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची तपासणी, माहिती संकलन, नोंदणी आणि अहवाल सादरीकरणाच्या पद्धतीबाबत प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये,आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथील प्रशिक्षक डॉ. विनायक भोई, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. शरण काठोळे आणि आरोग्य सहाय्यक शैलेश वाघाटे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सेवक उपस्थित होते.
आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांचे प्रमाण शोधून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



