रत्नागिरीत ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार प्रमोद जठार यांनी स्वीकारली निवेदने

रत्नागिरी- भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत रत्नागिरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्या निवेदनांचा स्वीकार करण्यात आला.
यावेळी भाजपा कोकण विभागाचे संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आमदार प्रमोद जठार आणि संतोष साखरे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध विकासकामे, शासकीय प्रश्न तसेच प्रलंबित कामांबाबत नागरिकांनी आपल्या मागण्या व समस्या मांडून निवेदने सादर केली.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची आमदार प्रमोद जठार व संतोष साखरे यांनी आस्थेने दखल घेतली. संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांच्या हक्काचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांचे निराकरण करणे, हीच ‘सेवा अभियानाची’ भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते थेट नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने उपलब्ध राहून विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सेवा हीच संघटनेची ओळख आणि नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण हेच ध्येय’ या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.
यावेळी रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, मंडळ अध्यक्ष दादा ढेकणे, डॉ. ऋषीकेश केळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन
19/08/2026



