NCMC कार्ड सक्तीला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध; नोंदणी-वितरण पूर्ण होईपर्यंत सवलतीचे तिकीट सुरू ठेवण्याची मागणी

रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड नसल्यास सवलतीचे तिकीट नाकारण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, NCMC कार्डची नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसताना “कार्ड नाही म्हणून सवलत नाही” या नियमाची सक्ती करू नये, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने केली आहे.यासंदर्भात पक्षाच्या वतीने रत्नागिरी विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. NCMC कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्ड सक्तीचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी महिलांना NCMC कार्डाच्या सक्तीमुळे येत असलेल्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तर उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी, “आज आम्ही प्रेमाने सांगत आहोत. अन्यथा यापुढे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी,” असा इशारा दिला.
या निवेदनावेळी लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, आसगे विभागप्रमुख व महिला तालुकाप्रमुख ममता जोशी, महिला शहरप्रमुख सेजल बोराटे, लांजा महिला संघटिका आसावरी मांडवकर, नगरसेविका फौजिया मुजावर, शिरगाव महिला विभागप्रमुख आस्था धांगडे, कोतवडे महिला विभागप्रमुख साक्षी साळुंखे, लांजा युवा उपसंघटिका दिव्या मांडवकर, लेखिका व महिला शिवसैनिक मेघा कोल्हटकर, राजापूर शहर युवती अधिकारी गार्गी शिर्के, स्नेहा उगले आदी उपस्थित होते.
NCMC कार्ड मिळेपर्यंत सवलतीचे तिकीट बंद करू नये, अन्यथा सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने मांडली आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



