रेशन दुकानाला प्रशासनाचा सील; कोकण नगरातील नागरिकांना दिलासा

रत्नागिरी- शहरातील कोकण नगर परिसरातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाने कारवाई करत दुकान सील केले आहे. हे रेशन दुकान परवानाधारक मनीषा गोठणकर यांच्या नावावर असून, गेल्या अनेक महिन्यांपासून या दुकानाबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी करण्यात येत होत्या.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रेशनचे धान्य वेळेवर मिळत नव्हते, दुकान नियमित वेळेत उघडले जात नव्हते तसेच अनेकदा दुकान बंद आढळत होते. त्यामुळे परिसरातील लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या समस्यांबाबत स्थानिक नगरसेवक केतन शेटये आणि फौजीया मुजावर यांच्याकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नागरिक आणि नगरसेवकांनी संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत पुरवठा निरीक्षण अधिकारी निशा पाईकराव, सायली चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. चौकशीनंतर संबंधित रेशन दुकानावर कारवाई करत प्रशासनाने दुकानाला सील ठोकले.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत नागरिकांना वेळेत आणि नियमितपणे धान्य उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, त्यामध्ये कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
दरम्यान, दुकान सील झाल्यानंतर कोकण नगर परिसरातील लाभार्थ्यांना लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून नियमित धान्य वितरण सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
9404773600



