गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एस.ए.पी. (SAP) जागरूकता आणि मुलाखत तयारी’ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी- गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखा व उत्कर्ष फौंडेशन, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एस. ए.पी. (SAP) जागरूकता आणि मुलाखत तयारी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालायाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात ही कार्यशाळा झाली.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, श्री. दिलेन्द्र शिरधनकर, श्री. राहुल पाटील, श्री. यशोधन जोगळेकर आणि डॉ. यास्मीन आवटे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. यास्मीन आवटे ह्यांनी वाणिज्य शाखेच्या पदवीधरांसाठी उद्योगाशी संबंधित मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यामागे कोणती भूमिका असते हे स्पष्ट केले.
या कार्यशाळेत ‘एस. ए.पी. (SAP) ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. दिलेन्द्र शिरधनकर ह्यांनी ‘एस. ए.पी मधील मुलभूत संकल्पनांची माहिती दिली. तसेच कॉर्पोरेट विश्वात ERP कौशल्य अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. श्री. राहुल पाटील ह्यांनी मुलाखतीची तयारी करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये रेझ्युमे तयार करण्यापासून ते संवाद कौशल्य, HR मुलाखतीच्या फेऱ्या इत्यादी बाबत संवाद साधला.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अध्यक्षीय मनोगतात, ‘विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासोबत कौशल्ये आत्मसात केली पाहिजे व एस. ए.पी. मधील नैपुण्य नोकरी संदर्भात मार्गदर्शक ठरते.’ असे प्रतिपादन केले
या कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. मीनल खांडके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ह्या कार्यशाळेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून PG आणि UG विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋचा जोग ह्यांनी केले. कार्यशाळेचे तांत्रिक कामकाज प्रा. मयुरेश पंडित यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तरांच्या सत्राने झाला; या कार्यशाळेमुळे विद्यार्थी आगामी कॅम्पस प्लेसमेंट आणि करिअरमधील वाटचालीसाठी अधिक सज्ज आणि प्रेरित झाले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



