थिबा पॅलेस रोडवरील महावितरणचा वीजखांब धोकादायक; मोठ्या दुर्घटनेची शक्यता

रत्नागिरी – शहरातील थिबा पॅलेस रोडवरील महावितरणचा एक वीजखांब सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत उभा असून, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे तो जमिनीपासून सैल झाला आहे. त्यामुळे हा खांब कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर वीजखांब रस्त्याच्या मध्यभागी असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच विविध खासगी क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. याशिवाय थिबा पॅलेस परिसरात दररोज पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा वीजखांब यापूर्वीच धोकादायक स्थितीत होता. वेळेत तो हटविण्यात किंवा दुरुस्त करण्यात आला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. सध्या खांब एका बाजूला झुकला असून तो केव्हाही कोसळू शकतो.
मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरण आणि संबंधित प्रशासनाने तातडीने या वीजखांबाची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
04/07/2026



