जिल्हाधिकारी कार्यालयात पावसातही तिरंगा फडकला

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या सरींमध्येही हा सोहळा अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा झाला.
ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रमुख, पोलीस विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला कर्मचारी आणि युवा वर्गाच्या सहभागामुळे वातावरण आणखी उत्साहवर्धक झाले होते. तिरंग्याच्या सलामीसोबत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले.भर पावसातही उपस्थितांनी देशभक्तीचा उत्साह कायम ठेवला. पावसाच्या थेंबांसह तिरंगा वाऱ्यात फडफडताना पाहून अनेकांच्या डोळ्यांत अभिमान आणि भावनांचे अश्रू दाटून आले. कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील हा सोहळा केवळ औपचारिकता नसून, स्वातंत्र्याचा गौरव आणि देशाबद्दलची निष्ठा दाखवणारा क्षण ठरला. पावसातही तिरंग्याला दिलेली सलामी हा रत्नागिरीकरांच्या देशप्रेमाचा जिवंत पुरावा होता.
कोकण ऑनलाईन, रत्नागिरी



