आदिशक्ती अभियानात कुवारबाव ग्रामपंचायतचे सुयश, होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

रत्नागिरी – शासनाने नुकत्याच महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आदिशक्ती अभियान राबविले होते. या अभियानात ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या जाणून घेणे, सामाजिक दृष्ट्या महिलांना सक्षम करणे तसेच महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे अशी अनेक उद्दिष्टे ठरवण्यात आली होती.
दिनांक २२ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध प्रकारचे उपक्रम राबविणे महत्वाचे होते. या अभियाना अंतर्गत एकूण १३ निकष निश्चित करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने राज्य, जिल्हा आणि ग्राम पातळीवर ही आदिशक्ती अभियान स्पर्धा घेण्यात आली होती.
प्रस्थापित नसलेल्या आणि कष्टकरी जनता मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या अभियानात सहभागी होणे आणि शेवटपर्यंत टिकून राहणे अतिशय कठीण काम होते, परंतु कुवारबाव ग्रामपंचायतीच्या आदिशक्ती अभियान अध्यक्षा सौ स्नेहल वैशंपायन यांनी सातत्याने सर्व सहकाऱ्यांसोबत विविध उपक्रम यशस्वी केले आणि तालुकास्तरीय स्पर्धेत कुवारबाव ग्रामपंचायत द्वितीय क्रमांकाची विजेती ठरली आहे.
या अभियानात सौ स्नेहल वैशंपायन अध्यक्षा, सौ विभावरी कोळेकर, सचिव, सदस्य प्रकाश शिंदे, अविनाश खडपकर,मधु शिवलकर,स्वाती लांजेकर तसेच सौ वीणा पटवर्धन पोलिस पाटील यांनी प्रशासिका सौ. समीक्षा तळेकर आणि ग्राम विस्तार अधिकारी श्री बुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती अभियान यशस्वीरित्या राबविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



