राज्याभिषेक दिनानिमित्त उबाठा शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

रत्नागिरी – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक पराक्रमाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर समाजात कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करण्याची गरज असल्याचेही तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, नगरसेवक केतन शेटये, सलील ढाफळे, नितीन तळेकर, राजू सुर्वे, सादिक पावसकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
06/06/2026



