दहावीची परीक्षा संपली; विद्यार्थ्यांचा रंगपंचमीत जल्लोष, निकालाची मात्र उत्सुकता कायम
रत्नागिरी – आज दहावीच्या शेवटच्या पेपरनंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि आनंदाचा एकत्रित अनुभव घेतला. परीक्षा संपताच शाळांच्या बाहेर विद्यार्थ्यांनी एकमेकांवर रंग उधळत रंगपंचमी साजरी केली. अनेक दिवसांच्या तणावानंतर विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने आनंद व्यक्त केला.
दहावीची परीक्षा सुरू असताना सर्वत्र रंगपंचमी साजरी होत असली तरी अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य देत या उत्सवापासून दूर राहणे पसंत केले होते. मात्र आज परीक्षा संपताच त्याच विद्यार्थ्यांनीही उत्साहात सहभाग घेतला.
शाळांच्या परिसरात रंगांची उधळण, मित्रमैत्रिणींमधील हशा आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी फटाके फोडूनही आनंद व्यक्त केला.
दरम्यान, एकीकडे परीक्षा संपल्याचा आनंद साजरा होत असला तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीचा निर्णय ठरणार असल्याने निकालाबाबत उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



